Tuesday, April 14, 2020

मरीआई बया, दार उघड, लक्ष्मीआई बया, दार उघड !’

एकदा शाळा सुरू होऊन महिनाच उलटला होता, गावकुसाबाहेरील मरीआईच्या मंदिरात आषाढाचा नैवेद्य घेऊन जाण्यासाठी आई गुळाच्या पुऱ्या तळत होती. तळणाचा तो गंध नाकात घेऊन शाळेच्या वाटेकडे माझी पावलं झपझप पडू लागली. तोच, ढोलकीचा लयबध्द नाद अन् त्याच्या जोडीला झपझप पडणाऱ्या पावलातील घुंगरांच्या चाळांचा ठेका पडू लागला. त्या दिशेला सहज नजर फेकली तर खांद्यावर रूळणारा काळाभोर मोकळा केशसांभार, मोठ्या भाळावर दाबून भरलेला हळदी– कुंकूवाचा मळवट, उघड्या रापलेल्या अंगावर हातातल्या जाड्या भरड्या सोट्याचे स्वहस्तेच पडणारे असंख्य फटके, कमरेभोवतालच्या रंगबेरंगी चिंध्यांच्या घेरेदार वस्त्रावर रूळणाऱ्या घुंगूरमाळा अन् अनवाणी पावलांच्या घोट्यांभोवती करकचून बांधलेले मोठ्या घुंगरांचे चाळ…अशा भेदक रूपाच्या दर्शनाने माझ्या पावलातली गती नकळत मंदावत गेली.
आजीकडून ऐकलेल्या गोष्टीतला पोतराज नकळत समोर प्रकटलेला बघून मी अवाक् झालो अन् शाळा विसरून त्याला निरखू लागलो. एरव्ही, आषाढातल्या अमावस्या अन् पौर्णिमेससह महिनाभर प्रकटणाऱ्या पोतराजाला बघून सारं गाव पसाभर धान्य अन् एखाद दुसरं नाणं त्याच्या पदरी टाकून मोकळं व्हायचं. सहसा त्याच्या नजरेला नजर देण्याची हिंमत मी गावातल्या सर्वात श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या आप्पा पैलवानाच्या नजरेतही कधी पाहिली नव्हती. पण कधी-कधी कुतूहल ही हिंमत देतं. त्याच कुतूहलापोटी मी याची देही दिसणारा पोतराज न्याहाळू लागलो. एका क्षणाला त्याची अन् माझी नजरा नजर झाली. त्याच क्षणाला त्यानं कमरेचा आसूड काढत स्वत:च्या रापलेल्या पाठीवर मारलेले शेंदूर लावलेल्या सोट्याचे दोन ताकदवान फटक्यांची आठवण आजही माझ्या देहाचा थरकाप उडविते. तो पोतराज डोळ्यात भरून मी शाळेत बसलो. तेव्हा माझ्या कानात दिवसभर कवितेचे दोन शब्दही गेले नाहीत की, फळ्यावरच्या आकडेमोडीतनं मला गणितातल्या गुणाकार अन् भागाकाराच्या सूत्रांचे कोडेही उलगडले नाहीत. घरी आल्यावर हातपाय धुताना हुडहूडी भरून तापानं चांगलाच फणफणलो. दुसऱ्या दिवशी मला तपासताना डॉक्टर वडिलांना सांगत होते की, ‘काही प्रतिमा मुलांच्या मनात भिती निर्माण करतात. मुळात या प्रतिमा वाईट नसतात. त्यांना आपणचं भेसूर बनवून कमी लेखतो. ती भिती मुलांच्या मनातून आपणचं काढायला हवी. त्यानंतर वडिलांच्या कड्यावर बसून पोतराजाला जवळून पाहिलं अन् तेव्हापासून त्यालाही एक भावविश्व असल्याची जाणीव नव्याने झाली.
ग्रामसंस्कृतीने ज्या अनेक पात्रांना जन्म दिला त्यापैकी कडक लक्ष्मी म्हणून ओळखला जाणारा पोतराजही एक. मानवापेक्षा मोठ्या सत्ताधारी असणाऱ्या अज्ञात-अतिंद्रीय शक्तीच्या शोधार्थ प्राचीन काळापासून अनेक धर्म-संप्रदाय-प्रथा अन् परंपरा जन्मास आल्या. यातील सात्विक होते ते भक्तीमार्गी बनले तर काही तामसिक हे शाक्तपंथाकडे वळले. गावकुसाच्या कुशीत राहणाऱ्या समाजानं पदरी दिलेलं उपेक्षेचं दान सांभाळत त्यांनी शाक्त मार्गाने दैवत मानलेल्या देवीची अर्थात मरी आईची आळवणी चालवली. ते तत्कालीन समाजप्रवाहात पोतराज म्हणून गावकुसाच्या प्रांगणात आत्मक्लेष करत आले.
ग्राम रचनेत गावाच्या वेशीजवळच्या ग्रामदैवतांपैकी एक असणारे मरीआई हे पोतराजाचे दैवत. साक्षात देवीच्या सूचनेवरून पोतराजाचा वेष धारण करून भाविक अन् देवतांच्या मधला दुवा बनण्याचं प्राक्तन स्वीकारल्याची या समाजाची श्रध्दा आहे. मरीआई मुळची दक्षिणेतली. हिला प्रसन्न करण्यासाठी पशूचा बळी देणारा तो दक्षिणेतला पोतराज. पोत म्हणजे बकरा किंवा पशू, असे लोकसाहित्यातील अभ्यासकांचे संदर्भ सांगतात. त्यावरून त्यांना पोतराज नाव पडले असावे. ‘जसा भाव, तसा देव’ या म्हणीप्रमाणे गावात स्थिरावलेल्या माणसाची दैवतंही गावाच्या वेशीबाहेर खुंटी ठोकून बसविलेली. अन् काबिल्यासह मरीआईचा सांगावा घेऊन भटकणाऱ्या पोतराजाच्या डोईवर मात्र मरीआईचा फिरता देव्हारा. एखाद्या रोगाच्या साथीनं जेव्हा सारा गाव उंदरांच्या पिल्लागत टपा-टपा मरायचा तेव्हा अज्ञान घाल्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी ग्रामदैवतांपाशी साकडं पडायचं. मग गावकुसाबाहेरच्या मंदिराच्या प्रांगणात गावगाड्यातल्या बाया बापड्यांचे परिघ फुलू लागायचे. भोवताली पडलेला गर्दीचा वेढा बघून पोतराजाचं आगमनही तेव्हा बोलतं व्हायचं…
‘बया, दार उघड, बया, दार उघड,
मरीआई बया, दार उघड,
लक्ष्मीआई बया, दार उघड !’
गावाला आयु- आरोग्य देण्याची भिक्षा आपल्या देवतेपाशी मागणारा हा पोतराज मात्र स्वत:च्या रापलेल्या शरीराला अणकुचीदार दाभणानं पिढ्यान पिढ्या भोकं पाडत आला. काळ्याभोर शरीरावर ओघळणाऱ्या रक्ताच्या धारांनीही ही मरी आई प्रसन्न झाली नाही तर स्वत:च्याच दाताना स्वत:च्या हाताला चावे घेत अन् उघड्या पाठीवर शेंदूरानं ल्यालेल्या कोरड्याचे म्हणजे चाबकाचे फटके स्वत:वरच मारत त्यानं बयेच्या दारापाशी पिढ्या पढ्यिा बस्तान मांडलं.
बापाच्या हातातल्या आसूडाचा टोक धरून एका पोतराजाचं पोरगं गावोगावच्या वाटा तुडवायचं. त्याला मिसरूड फुटायला लागल्यानंतर पंचायतीला त्या पोरातही पोतराज नजरेला पडू लागला. या पोराला आपल्या वाट्याचं सोंग प्रदान करण्यासाठीच्या विधीच्या दिवशी पोतराजाच्या वस्तीवर तिखटाचं जेवण झालं तेव्हा मोठ्या पोतराजानं बायकोच्या अंगावरच किडूक –मिडूक विकून पंचायतीचं मन राखलं होतं. त्याच सुमाराला उभी हयातभर डोईवर मरी आईचा देव्हारा मिरविणाऱ्या बायकोला अज्ञात रोगापासून सोडविण्यासाठी आषाढी अवसेच्या रात्री म्हातारा पोतराज देवीच्या नावानं अंगभर दाभण खोचून रक्तबंबाळ झाला होता. पण उपयोग झाला नाही. पुढच्या पौर्णिमेलाच म्हाताऱ्या पोतराजाची जोडीदारीण देवीकडं कायमचीच निघून गेली.
पुढची कर्म उरकल्यानंतर नव्याने पोतराज बनलेलं ते त्याचं तरणबांड पोर बापाने दाखविलेल्या गावाच्या वेशीकडे चालतं झालं. पण लहानपणी पाहिलेला त्या वेशीबाहेरचा देवीच्या मंदिराचा कळस त्याच्या नजरेला काहीकेल्या पडेचना. त्याची नजर सैरभैर झाली. एका लिंबाकडे बघून त्याच्या स्मृती जागृत झाल्या. या गावाच्या जत्रेत पाळण्याच्या हट्टामुळं बापाच्या आसूडाखाली पाठ बडवून घेतल्यानंतर याच लिंबावर त्याच्या बापान त्याला झोका बांधून दिला होता. या थोराड लिंबावरच्या खुणा त्याला आता ओळख देऊ लागल्या होत्या.
या लिंबाखालीच थाटलेल्या एका टपरीवाल्याकडे नव्या पोतराजानं देवीच्या जुन्या मंदिराविषयी विचारणा केली. त्यावर, त्या मंदिराच्या जागेवरचं अलिशान इमारत उभी राहिल्याची घटना टपरीवाल्याने हातातल्या पानावर कात चढवताना त्याला सांगितली. ‘आता गाव आषाढातला निवीद घेऊन इकडं फिरकत न्हाई. कोऱ्या खट्ट इमारतींच्या उंच टेरेसवरच गावकरी आता आषाढाच्या शेवटच्या दिवशी पार्टी रंगवतात…’ हे वास्तव पानवाल्याच्या तोंडून कानावर पडताच भेदक दिसणाऱ्या नव्या पोतराजाच्या हातातला आसूडं त्याच्या हातनं नकळत खाली गळून पडला.
डिस्क्लेमर : उपरोक्त लेखातील मते लेखकाची व्यक्तिगत मते आहेत.

No comments:

Post a Comment

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...